HSRP नंबर प्लेट बसवली नाही, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

HSRP  नंबर प्लेट बसवली नसेल ‘त्या’ वाहनांवर कोणतीही कारवाई करणार नाही, सरकारकडून स्पष्ट

मुंबई : राज्य शासनाने दिनांक १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. अशा जुन्या वाहनांना यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे.

राज्यात सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावणाऱ्यांची टक्केवारी अतिशय मोजकी आहे. आतापर्यंत २० टक्के वाहनांनाच एचएसआरपी पाटी लागली आहे. तसेच १० टक्के वाहनधारकांनी पाटी लावण्यासाठी वेळ घेतली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या वाहनांपैकी अजूनही ७० टक्के वाहनधारकांनी एचएसआरपी पाटी लावली नसल्याचे सांगितले जाते.

तथापि, दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी, तरी एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) न बसविणाऱ्या वाहनांवर १ डिसेंबर २०२५ नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.