नाशिक : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवून ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला असून तो १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी स्वरूपात लागू केला आहे. राज्याच्या वित्त विभागाकडून यासंबंधीचा जीआर निघाला आहे. ही वाढ ७ महिन्यांच्या थकबाकीसह ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने अदा केली जाणार आहे. महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स हा सरकारी कर्मचारी आणि काही पात्र कर्मचाऱ्यांना महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जाणारा अतिरिक्त भत्ता आहे. त्याची गणना सामान्यतः कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या ठराविक टक्केवारीनुसार केली जाते. आता राज्य सरकारने महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढविल्याचा फायदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा : महागाई भत्त्याची रक्कम अदा करण्यासंदर्भातील सध्याच्या तरतुदी आणि कार्यपद्धती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यामुळे संबंधित विभागांना विद्यमान नियमांनुसारच वाढीव महागाई भत्त्याचे वितरण करावे लागणार आहे. या निर्णयामुळे महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन सातव्या वेतन आयोगानुसार पगारात भरघोस वाढ : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. नवीन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरदारांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे.
ऑगस्टमध्ये डीएची थकबाकी मिळू शकणार  : राज्य सरकारने यासंदर्भात शासन आदेश जारी केला असून कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीची थकबाकीही मिळणार आहे. ही थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना थकित रक्कमही मिळणार आहे.