Nashik City News: जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शहरालगतचा पाथर्डी कचरा डेपो परिसर आणि त्याच्या भोवतीचा 1 किमी परिघ ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या 1 किमी ‘बाधित क्षेत्रातील’ सर्व वराहांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Nashik City News: नाशिक जिल्ह्यात मयत झालेल्या डुकरांमध्ये (Pigs) आफ्रिकन स्वाईन फिव्हर या अत्यंत संसर्गजन्य आणि घातक रोगाचे विषाणू आढळल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त होताच, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या आजाराचा प्रसार तातडीने थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जारी केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शहरालगतचा पाथर्डी कचरा डेपो परिसर आणि त्याच्या भोवतीचा 1 किमी परिघ ‘बाधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या 1 किमी ‘बाधित क्षेत्रातील’ सर्व वराहांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.

या बाधित क्षेत्राच्या आसपासचा 10 किमी परिघ ‘निगराणी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात वराहांच्या हालचालींवर कडक नजर ठेवली जाणार आहे.

ASF चा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध

  • जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ASF चा प्रसार रोखण्यासाठी जैवसुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
  • बाधित क्षेत्रातील परिसराचे तात्काळ निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे.
  • डुकराचे मांस विक्री आस्थापनांची नोंदणी सक्तीची करण्यात आली असून, पशुवैद्यकांकडून त्यांची नियमित तपासणी केली जाईल.
  • शहरात मोकाट डुक्करपालन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
  • जंगली आणि पाळीव डुकरांच्या मृत्यूवर कडक नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • घरगुती किंवा हॉटेलमधील शिल्लक अन्न वराहांना न देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे, कारण यातून विषाणूंचा प्रसार होण्याची शक्यता असते.
  • डुक्करपालन आणि मांस विक्री केंद्रातील कचरा साठवणूकीवर बंदी असून, त्याची तात्काळ विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

जिल्हा प्रशासनाने जागृती मोहीम आणि वाहतूक बंदी

जिल्हा प्रशासनाने पशुपालक, व्यापारी, कसाई यांच्यात जागृती मोहीम अनिवार्य केली आहे. तसेच, शेजारील राज्यांमधून वराहांची अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आणि चेकपोस्टना कडक निर्देश देण्यात आले आहेत. या आजाराचा वराहांमधून माणसांमध्ये संसर्ग होत नसल्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.